आमच्याबद्दल

"बा रायगडा तुझ्या चरणातील मी एक धुलीकण,
अलंकारण्यापरी पाय तुझे धुळीचेच आहे मज भूषण"

महाराष्ट्राच्या समर भूमीच्या कित्येक रणक्षेत्रांत अनेक शुर विरांची चरणधूळ पसरलेली आहे.त्या शुरविरांच्या कर्तव्याच्या रुणातून ऊतराई होण्यासाठी त्यांचे चरण आलंकारण्यास आपणां सांरख्या पामरांस ती चरण धूळच पुरेशी आहे.त्या चरण धुळीलाच आई भवानीचा भंडारा समजून भाळी लेवून या जिवनाचे सार्थक नक्की होते.वरील दोन वाक्ये दुर्गअभ्यासक संशोधक प्र.के.घाणेकर सरांच्या 'अथातो दुर्गजिद्नासा" या पुस्तकातील आहेत.त्यांनी तात्कालीन स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगडास एक अमर्याद असा मित्र तसेच एक 'बा' म्हणजे बाप किंवा वडील अशा आलंकारीक शब्दसुमनांची परडी आपल्या ओघवत्या लेखन शैलीतून रायगडा चरणी वाहिली आहे.आपल्या साडेपाच फूट उंचीच्या देहास पाचही पदपातशाह्या समवेत सह्याद्रीच्या दर्या खोर्यात उघड्या काळ्याकुट्ट देहाने झट्या घेत गाडून घेणार्या मावळ्यांचा पिता म्हणजे म्हणजे 'बा रायगड'.सबंध स्वराज्यावर आपल्या बाप मायेने जातीने लक्ष ठेवणार्या व शिवरायांस लेका प्रमाणे सांभाळणार्या त्या दुर्गदुर्गेश्वर रायगडास बाप मानून,पिता मानून त्याची सेवा करणे व त्यातूनच प्रेरणा घेऊन या 'बा रायगड परिवार' या संस्थेची पायाभरणी झाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअँप समूहाच्या माध्यमातून परिवाराची बीजे रोवली गेली. २०१६ सालच्या रायगडी झालेल्या अभ्यासमोहिमेत या बीजाला खतपाणी घातले गेले. अल्पावधीतच लहान-थोर, अभ्यासू- होतकरूंच्या साथीने या सह्याद्रीला मायबाप अन गडकोटांना शिवराय मानणाऱ्या सह्यभटक्यांची जोड परिवाराला लाभली. महाराजांचा जन्म गडावर, संपूर्ण हयात गडावर गेली मग महाराजांचा जन्मोत्सव गडावर का नाही ? ठरलं तर मग शिवजन्मोत्सव गडावर करायचा अन लगबग झाली किल्ले सुधागडवरील जन्मोत्सवाची. २०१७ सालच्या पहिल्या सुधागड शिवजयंतीच्या दिमाखदार सोहळ्यात या बीजाला अंकुर फुटला. होय अंकुर होता दुर्गसंवर्धनाचा. शिवछत्रपतींची मूर्त स्मारके असलेल्या या गडकोटांना दैदिप्यमान इतिहास आहे पण त्याचं ढासळत असलेलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा, त्यांना संवर्धित करण्याचा वसा परिवाराने घेतला. शिवजन्मोत्सवाच जन्म घेतला एका नव्या प्रेरणेने. संवर्धनाचा वसा घेऊन परिवाराचे रोपटे एका शाश्वत वृद्धीकडे वाटचाल करू लागले. रायगडास बाप मानून स्वतःला ह्या सह्याद्रीची, शिवचरणातील धूळ समजून सेवेसी ठायी तत्पर धूलिकण सज्ज झाले. स्वराज्याच्या राजधानीला पर्याय ठरलेला किल्ले सुधागड सर्वप्रथम संवर्धनासाठी घेतला गेला. सुधागड भव्यता पाहता काम करणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे होतं. पण तरीही संवर्धनाची मुहूर्तमेढ इथेच रोवली गेली. एक प्रवास सुरु झाला लांब पल्ल्याच्या भटकंती मोहिमांचा.. घाटावरून कोकणात उतरणाऱ्या घाटवाटांच्या अभ्यासपूर्ण मोहिमा आखल्या गेल्या त्यात महाराष्ट्रभरातील अनेक सह्यसखे सहभागी झाले अन परिवाराला , कार्याला महाराष्ट्रभर घेऊन गेले. बा रायगड परिवाराच्या कक्षा रुंदावत गेल्या , महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धुलिकनांनी त्यांच्या विभागात कार्य चालू केले.

संवर्धनाची व्याप्ती वाढली. नाशिक मध्ये अंकाई टंकाई , बोईसर जवळच्या किल्ले आसावा , सांगली मध्ये कोळदुर्ग - जुना पन्हाळा, पुणे - रायगड सीमेवरील कावळ्यागड - लिंगाणा, रत्नागिरी मधील दुर्गम सुमारगड, माणदेशातील महिमानगड, साताऱ्यातील कल्याणगड, ठाण्यात किल्ले चंदेरी, तोरण्यावरील कापूरलेणीचे संवर्धन कार्य सुरू झाले. सोबतच वाफगाव गढी, बहादूरवाडी गढी येथे सुद्धा सफाईचे काम सुरू झाले. वीरगळ संवर्धन मोहिमांतून बऱ्याच गावातील विरगळींना गतवैभव प्राप्त करून देण्यास परिवाराने प्रयन्त केले. महाराजांच्या कार्याचा प्रसार अन संवर्धनाचा पोत जाळण्यासाठी गडावर शिवकाळात नेणारे सोहळे होऊ लागले. सुधागड शिवजयंती, रायगड अभ्यासमोहिम, राजगड अभ्यास मोहिमेच्या आयोजनातून अभ्यासपूर्ण शिवकाळ जगाला गेला.

भूगोलाशिवाय इतिहास जोखता येत नाही अन त्या ऐतिहासिक भूगोल जपण्यासाठी परिवार अहोरात्र झटत आहे. काही घटना आशा घडतात ज्यातून तुमच्या कार्य करण्याच्या जिद्दीला प्रेरणा मिळते. दुर्गसंवर्धन करताना काही ऐतिहासिक ठेवा तुमच्या हाती लागतो अन निस्वार्थ कार्याचा प्रसाद तुमच्या पदरी पडतो. किल्ले आसावावरील पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहून परिवाराने गडावरील सर्वात मोठे टाके साफ करण्याचा निर्धार केला अन जवळपास वर्षभराच्या अथक परिश्रमाने गडदेवतेने आशीर्वाद दिला. टाक्यांमध्ये इंग्रजी बनावटीच्या एक लहान अन एक मोठी अशा दोन तोफ सापडल्या अन किल्ल्याच्या इतिहासात नवीन अध्याय जोडला गेला. या मुलूखमैदान तोफेस साजेसा सागवानी गाड्यावर विराजमान करून दरारा कायम ठेवला.

असाच दुसरा दृष्टांत गडदेवतेने सांगलीजवळील कोळदुर्ग किल्ल्यावर दिला. जवळपास सहाव्या शतकातील शिलालेख सापडला. गडाच्या प्राचीनतेची साक्ष हा ऐतिहासिक ठेवा परिवाराच्या धुलिकणांनी प्रकाशझोतात आणला. त्याचा अभ्यास करून हा वारसा यथासांग गडावर जपला आहे. गडाचा इतिहास लोकांपर्यंत पोचण्यासाठी तिथे शिवप्रेमीं, पर्यटक, स्थानिक लोक यांचा राबता वाढला पाहिजे. या साठी गड जागते ठेवले पाहिजेत , तिथल्या वस्तूंची डागडुजी केली पाहिजे काही गरजेच्या उभारल्या पाहिजेत. यातूनच अन इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनातून सुधागवरील मंदिर अन महादरवाजा पुनर्बांधनीचे ध्येय परिवाराने उराशी बाळगले. पूर्णपणे नामशेष झालेल्या शिवमंदिर अन गजलक्ष्मी मंदिराची पुनर्बांधणी करून परिवाराने जीर्णोद्धार केला. किल्ले रायगडच्या महाद्वाराशी साधर्म्य असणारा महादरवाजा सुधागडलाही आहे. या देखण्या दरवाजाने कितीतरी आक्रमण थोपवली असतील अन म्हणूनच त्याचा शिवकालीन थाट , भव्य लाकडी दरवाजा बांधण्याचे शिवधनुष्य परिवाराने उचलले. अन पाहता पाहता जवळपास सहस्त्र किलो वजनाचा सोळा फुटी भव्य सागवानी दरवाजा तयार झाला. २०२० सालच्या अभूतपूर्व आशा शिवजन्मोत्सव सोहळ्यात स्वराज्याअर्पण केले गेले. आज नवी सुधागडची ओळख बनत आहे हा दरवाजा. याच सोबत संवर्धन करीत असलेल्या गडावर मार्ग सुकर करने, दिशादर्शक, माहितीफलक, गडाचे दस्तऐवजीकरण करणे यासारखी असंख्य कामे गडावर नित्यनेमाने चालू आहेत.

दुर्गसंवर्धनासोबतच परिवाराने सामाजिक बांधिलकी राखत बरेच समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले गेले. आपण गडावर जातो, फिरतो पण तिथल्या गडरहाळतील लोकांसाठी परिवार सदैव प्रयत्नशील असतो. हेच लोक किल्ल्यांचे खरे राखणदार आहेत. त्याच बरोबर अनाथ आश्रम, सह्याद्रीतील दुर्गम खेडोपाडी जिथे अजूनही प्राथमिक सुविधांची वणवा आहे परिवारा जीवनउपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांच्या जीवनात आंनद आणण्याचा प्रयत्न करीत आहे. माणसाची माणुसकी ही संकटकाळी प्रकर्षाने दिसून येते. २०१९ सालच्या पावसाने संबंध महाराष्ट्र जलमय झाला. गडचिरोली, सांगली-कोल्हापूर पुराच्या बाहुपाशात अडकले गेले. परिवाराच्या आवाहनाला हजारो लोकांनी प्रतिसाद देऊन माणुसकीचे अलौकिक दर्शन घडवले. दुर्गम भागात , पूरग्रस्तांच्या अगदी उंबरठ्यावर जाऊन मदतकार्य परिवाराने केले. गडचिरोली येथील मदतकार्यात कर्मयोगी डॉ. प्रकाश आमटे यांनी कौतुकाने पाठ थोपटली.

स्वराज्यकार्य करीत असताना बरेच जण परिवाराच्या पाठीशी उभे होते. संवर्धनाचा मांडलेला संसार चालवण्यासाठी देणग्या येत होत्या पण शाश्वत वृद्धीकडे वाटचाल करत असताना स्वावलंबी व्हावे लागते. परिवाराचे सारथ्य हाडाचे सह्यभटके करत आहे अन त्यांच्या विचारातून जन्म घेतला भटकंती, गिर्यारोहण मोहिमांच्या आयोजनाचा. काही उद्दिष्ट समोर सह्याद्रीमध्ये मोहिमा घेण्यास सुरुवात झाली. अवघड गडांची सफर, आरोहण मोहिमा करणे खूप खर्चिक झालेत. याच मोहीमा कमी खर्चात आयोजित करून समाजाच्या प्रत्येक घटकाला याचा लाभ घेता यावा. यातून मिळणारा निधी हा पूर्णपणे संवर्धनासाठी वापरला जातो. या मोहिमांच्या माध्यमातून बरेच निष्ठावंत हात परिवाराला लाभले. निधींसंचय अन निष्ठावंत हात मिळणे हे या मागील महत्वाचे उद्दिष्ट होते अन सर्वार्थाने साध्य होतंय. राजगड ते रायगड (ऐतिहासिक घाटवाटांनी), महिपतगड-सुमारगड-रसाळगड, बागलाण, लोणावळा-भीमाशंकर, पन्हाळा ते विशाळगड इ. अशा लांब पल्याच्या पदभ्रमंती मोहीमा, लिंगाणा, तैलबैला, भैरवगड , अलंग-मदन-कुलंग सारखे तांत्रिकदृष्ट्या अवघड आरोहण मोहिमा, तसेच गडकिल्ल्यांच्या भटकंती-प्रदक्षिणा मोहिमा यासर्वातून परिवाराचे धूलिकण ऊर्जा मिळवत जगण्याची कला शिकत आहेत अन स्वराज्यकार्याची ज्योत अखंड तेवत ठेवत आहेत.

दुर्गदुर्गेश्वर रायगडला बाप मानलं आहे परिवाराने त्यामुळे रायगडी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात परिवाराचा कर्तव्यपूर्ण सहभाग असतो. महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास, प्रसार करणे हेतूने दरवर्षी अभ्यासमोहिमेत परिवारातर्फे एक विशेषांक मुद्रित होतो. बा रायगड विशेषांक, बा रायगडावारी, फिरस्ते सह्याद्रीचे, संपूर्ण सुधागड हे परिवाराची महितीपुस्तके प्रकाशित आहेत. त्याच बरोबर बा रायगड भटकंती कट्ट्याच्या माध्यमातून अभ्यासमय व्याख्याने अन परिवारातील सदस्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

एकंदरीत सर्वच क्षेत्रात परिवार कार्यरत आहे.दुर्गसंवर्धन,समाजकार्य,अरोहण मोहिमा, लांब पल्याच्या पदभ्रमंती मोहीमा, या सर्वच क्षेत्रांत परिवार कार्य करत आहे. सामाजिक कार्ये,तसेच अनेक इतिहासकारांची व्याख्याने अयोजित करण्यात येत आहेत. कित्येक शाळांना आर्थिक मदत ,शालेय साहित्याचे वाटप करीत आहे. कार्यातील सातत्यता व नियोजन बद्धता हा परिवाराचा कणा आहे.आपणहि या शिवकार्यात कुठल्याही अटी शिवाय सामिल होऊ शकतात.


Whatsapp+
Facebook
Instagram
Youtube
Twitter