२०१७ साली बा रायगड परिवाराने संवर्धन कार्याची सुरुवात केली त्यावेळी गडावरील भग्नावस्थेतील शिवमंदिर बा रायगड परिवाराच्या निदर्शनास आले । शिवमंदिराची अवस्था पाहून या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा संकल्प बा रायगड परिवाराने केला। त्याप्रमाणे शिवमंदिर कार्यास सुरुवात झाली। उध्दवस्त शिवमंदिराचे तासीव दगड पुन्हा एकत्र करून आसपासच्या परिसरातील इतर कोणत्याही वास्तू अवशेषांना धक्का न पोहचवता शिवमंदिर पुनर्बांधणी करम्यात आली। शिवमंदिरच्या छतासाठी लागणारे लोखंडी वजनदार समान परिवाराच्या निष्ठावंत धूलिकणानी मोठ्या कष्टाने व अथक प्रयत्नांनी सुधागड वर पोहचवण्याचे काम पार पाडले।
दिनांक १९ फेब्रुवारी२०१९ रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर जिर्णोद्वारीत शिवमंदिरातील यथोपचार अभिषेक करून परिवाराने शिवमंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण केला
३५० पेक्षा जास्त वर्ष झालीत शिवकाळाला काही किल्ले तर त्याहीपेक्षा आधीचे... अन पडझड झाली पण ती आपण संवर्धन का करतो कारण आपल्या पुढच्या पिढीकडे ते हस्तांतरित व्हावे. या एवढ्या वर्षाच्या पडझडीने, अनास्थेने त्यांच्या भूगोलाप्रमाणे इतिहाससुध्दा झाकोळला गेला आहे. संवर्धन फक्त भौगोलिक अस्तित्व टिकवण्याची धडपड नसून खऱ्या अर्थाने दैदिप्यमान इतिहास जोपासण्याचा उन्नत मार्ग आहे. काही गड एवढे दुर्लक्षित असतात का जनसामान्यांना अगदी हाकेच्या अंतरावर असून सुद्धा माहीत नसतात. पण दुर्गसंवर्धनामधून त्यास नवीन नवसंजीवनी मिळते.
असाच एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे बोईसर जवळचा आसावा..
औद्योगिक क्रांतीच्या प्रभावाने झाकोळून गेलेला एक दुर्लक्षित गड. मुंबईपासून मोजून दोन-अडीच तासांवर पण म्हणावी तशी पाऊले तिकडं वळत नाही. संवर्धनाच्या प्रतीक्षेत जणू. परिवाराने गड संवर्धनाला घ्यायचं ठरवलं अन २९ डिसेंबर २०१७ रोजी पहिली मोहीम ठरली.
उदक पाहून गड बांधावा या महाराजांच्या उक्तीप्रमाणे गड बांधले गेले. पण आता पाणी पाहून संवर्धनासी घ्यावे असे म्हणायला हरकत नाही. गड माथ्यावर बरीच पाण्याची खोदीव व एक बांधीव टाके आहे. पण एकही मोकळे नाही म्हणून गडावर पाण्याचे दुर्भिक्ष. सगळी टाकी गाळाने काठोकाठ भरलेली. पाणी आहे पण त्यासाठी अर्धा डोंगर उतरून खाली जावे लागते. पाणी नसल्याने गडमाथ्यावर काम करणे म्हणजे काम जिकरीचे. ठरलं तर मग गडावरील पूर्ण क्षमतेने गाळाने भरलेलं टाकं सर्वप्रथम मोकळे करायचा विडा उचलला.
टाके गाळमुक्त केल्याने पाण्याचा अन गडावर झाडे लावण्याचा मार्ग मोकळा होणार होता. पहिल्याच मोहिमेपासून टाके साफ करायच्या उद्देशाने लगबग चालू झाली. उन्हाचा तडाखा, दमट वातावरण , धो धो पाऊस या सर्वांवर मात करत कार्य चालू होते.
निस्वार्थी सेवेला फळ हे मिळतेच...
जवळपास वर्ष उलटून गेले पण टाकं काय गाळमुक्त होईना. होतेच म्हणा तेवढं मोठे अन शिबंदी तुटपुंजी..
अशाच एके दिवशी संख्येअभावी अगदी रद्द होणाऱ्या मोहिमेने मूर्त जिद्दीने मूर्त स्वरूप घेतले. अगदी १० जणांच्या चमूने १३ जानेवारी २०१९ रोजी गाळ काढण्याच्या उद्देशाने पाय गडावर ठेवले. इमाने इतबारे कार्य करीत असताना चुन्याचा दगड सावकाश काढण्याच्या प्रयत्नांत असलेले परिवाराचे धूलिकण श्री. नितीन भोसले यांच्या पहारीने एक नेहमीपेक्षा वेगळा आवाज केला. सर्वांचे कान टवकारले अन एकत्र आले अन पाहतो तर काय या दुर्लक्षित गडाचा अपरिचित वारसा मुक्तीच्या दिशेने वर पाहतोय. निःस्वार्थ सेवेचा गडदेवतेने दिलेला प्रसाद जणू. सापडली एक मुलुखमैदान तोफ...
हि असावा वरील १० वी संवर्धन मोहिम होती..
या मोहिमेत गडलक्ष्मीने पोरांच्या पाठीवर कौतुकाचे छत्र धरले.उमेद निर्माण करणारी गोष्ट घडली...
इंग्रजी बनावटीची ओतीव तोफ.
तोंडचा व्यास 8:5cm
पुढचा परीघ 54cm
मागचा परीघ 74cm
लांबी-140cm
तोफ सापडल्याने सर्वाना एक नवी उमेद मिळाली अन पुन्हा लगेचच पुढच्या रविवारी म्हणजे २० जानेवारी ला पुढची मोहीम आखली. याहिमोहिमेत गडलक्ष्मी अजून एक यश पदरात टाकले. अजून एक लहान तोफ अर्धवर तुटलेली तोफ सापडली, ही आकाराने आधीच्या तोफेपेक्षा लहान होती. ३१ इंच लांबीची (तुटलेल्या टोकापर्यंत) एक जण हाताळू शकतो अशी तोफ सापडली. आनंद द्विगुणीत झाला.
गड म्हटलं की तो लढता ठेवणे अपरिहार्यच या अनुषंगाने गडावर शस्त्रसाठा हा हवाच,नव्हे असायचाच..
पण,गडा गडांवरील तोफा कुठे गेल्यात हे कळायला काही मार्ग नाही.
काही तोफा लोकांनी गडांच्या खाली अक्षरशा ढकलून दिल्या.ज्या अकाराने लहान होत्या त्या घरात ठेवण्यासाठी नेल्या.
पण,हि भरभक्कम बांधणीची तोफ मिळणे म्हणजे काही साधी सुधी बाब नव्हे.गड चढून घाम गाळणाऱ्या आम्हा पोरांस त्याच कीती कौतुक म्हणून सांगू...!
जणू शिवरायांनी पाठीवर मारलेली ही कौतुकाची थापच.!!
आसावाचा इतिहास उलगडण्यासाठी एक महत्वाचा दुआ सापडला होता. या तोफेस तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तीस भक्कम सागवानी तोफगाड्यावर विराजमान करण्याचे ठरले. परिवाराच्या चैत्राली अन राहुलने हे तोफगाडा निर्मितीचे कार्य तडीस नेले. लोकसहभागातून या मुलूखमैदान तोफेस रविवार १६ जून २०१९ रोजी विराजमान केले अन तिचे स्वराज्य अर्पण मोठ्या दिमाखात अन भांडऱ्याच्या उधळणीत पार पडले.
या तोफेने काय दिले ? गडाच्या इतिहासातील पाने उलगडण्यास मदत झाली, गडावर येणाऱ्या लोकांची संख्या वाढली, स्थानिकांचा सहभाग वाढला अन महत्वाचे म्हणजे एक नवी उमेद मिळाली संवर्धन मोहिमेतील सदस्य संख्या वाढू लागली अन कार्य जोमाने होऊ लागले.
या पूर्ण प्रवासात आसावा संवर्धन मोहिमेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सुशांत कुरणे यांच्यासह असंख्य हातांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. असेच भरभक्कम कार्य प्रत्येक गडावर होवो अन गड पुन्हा पहिल्यासारखे राबते व्हावेत...स्वराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे...
सुधागड महादरवाजा -
एकेकाळी महाराजांनी राजधानीसाठी पर्याय म्हणून निवडलेला किल्ला म्हणजे सुधागड. राजधानीचा पर्याय असल्या कारणाने सुधागडवरील बांधकामेसुद्धा तशीच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यापैकीच एक म्हणजे सुधागडाचा महादरवाजा.
हा महादरवाजा म्हणजे रायगडावरच्या महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती. मोजमापाने जवळपास रायगड महादरवाजाइतकाच असलेला हा महादरवाजा बांधणीच्या बाबतीतही रायगडाच्या महादरवाजाशी साधर्म्य दाखवतो. साडे आठ फूट रुंद व 15 फूट उंच हा दरवाजा रायगडाप्रमाणेच गोमुखी बांधणीचा आहे. दरवाजाच्या दर्शनी भागावर हिंदू धर्मात अतिशय पूजनीय स्थान असलेली कमलपुष्प कोरलेली आहेत. त्याचप्रमाणे दोन शरमशिल्पे देखील आहेत. महादरवाजाच्या वरच्या बाजूस सुबक कमान तसेच महिरप आहे. रात्रीच्या पहारीसाठी मशाली व पलुते अडकवण्याची सोय देखील केलेली आहे. दरवाजाच्या उंबऱ्यातून पाणी जाण्याची सोय आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. बऱ्याच अंतरापर्यंत पायऱ्यांचे अवशेष देखील दिसतात. सर्वभक्षी काळाच्या ओघात व वरील पाणलोट क्षेत्रामुळे हा दरवाजा पूर्णपणे मातीत गाडला गेला होता. 1987 च्या आसपास निसर्गमित्र संस्थेने 3 वर्षे काम करून येथील बहुतांश माती काढली परंतु ती पुन्हा साचल्याने पुन्हा एकदा पूर्णमित्र पालीवाला कॉलेज, निसर्गमित्र व गिरिमित्र प्रतिष्ठान या संस्थांनी मिळून 2003 ते 2008 या काळात ही माती पुन्हा साफ केली.
महादरवाजा लाकडी प्रवेशद्वार -
2017 साली बा रायगड परिवाराने सुधागड किल्ला संवर्धनासाठी हातात घेत काही महत्वाची कामे गडावर राबविण्यास सुरुवात केली. यात महादरवाजा परिसर संवर्धन व लाकडी प्रवेशद्वार अर्पण हे एक महत्वाचे काम होते.
या महादरवाजास लाकडी द्वार बसवणे सोपे काम खचितच नव्हते. सुधागड हा चढाईसाठी अवघड समजला जाणारा किल्ला. अश्या किल्ल्यावर द्वार बसवण्याचे हे काम बा रायगड परिवाराच्या धूलिकणांनी स्वीकारले. महादरवाजाचे पूर्ण बारकाव्यासकट मोजमाप घेण्यात आले. सदर मोजमापावरून दरवाजा बनविण्याचे काम वखारीत पार पडणार होते. दरवाजा तसा प्रचंड. या मापाचे लाकूड मिळणे तसे सोपे काम नव्हते. हवे तसे, हव्या त्या मापाचे सागवानी लाकूड मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला. घेतलेल्या मोजमापावरून दरवाजाचा लाकडी साचा बनला. दुसरीकडे यावर लागणाऱ्या बिजागरी व इतर शोभेच्या लोखंडी वस्तूंचे काम चालू होते. दरवाजाचा प्रत्येक भाग पुरातन पद्धतीचा असावा. पूर्वीच्या तंत्रज्ञानानेच दरवाजा लागावा हे लक्षात घेऊनच दरवाजाचे काम केले गेले. 5 लाकडी भाग, दरवाजावरील लाकडी नक्षीकामाचे तुकडे, लोखंडी बिजागऱ्या, तसेच अणकुचीदार खिळे, लोखंडी शोभेची फुले अश्या वेगवेगळ्या भागांमध्ये दरवाजा तयार झाला.
आव्हान वाट पाहत होते. जिथे तिथे मोकळ्या हाताने चढ़तानाही दमछाक घेते अश्या सुधागडावर हा दिड टन वजनाचा ऐवज चढ़वायचा होता. बा रायगड परिवारा तर्फे २३ नोव्हेंबर ची तारिख नक्की करण्यात आली आणि तमाम शिवप्रेमी व दुर्गप्रेमिंना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रमदानाचे आवाहन करण्यात आले. बा रायगड परिवाराच्या ह्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत जवळपास २५० दुर्गप्रेमी या मोहिमेत सहभागी झाले. गडाची वाट तशी बिकटच. काही ठिकाणी एकावेळी एकच माणुस जाण्याइतकी अरुंद वाट, काही ठिकाणी मोठे दगड, तर दोन लोखंडी शिड्या, चिलखती बुरुजाची खडी चढाई अशी कित्येक आव्हाने झेलत मावळ्यांनी सलग १८ तासात दरवाजाचे सामान गडावर नेऊन पोहचवण्याचे अशक्यप्राय काम शक्य केले.
या पुढचा प्रवासही सोपा नव्हता. गडावर विजेची सोय नाही. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असतानाही सलग काही शनिवार-रविवार व वेळप्रसंगी सलग 5 दिवस गडावर राहून दरवाजा उभारणीचे काम बा रायगड परिवाराच्या धूलिकणांनी पूर्णत्वास नेले. या कामात काही अनुभवी सुतारांनी परिवाराच्या धूलिकणांना मार्गदर्शन मदत करत विषम परिस्तिथीतही दरवाजा उभारणीच्या कामात महत्वपूर्ण योगदान दिले.
महादरवाजा लोकार्पण -
दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंतीचे औचित्य साधत या लाकडी प्रवेशद्वार लोकार्पणचा सोहळा सुमारे 1500 दुर्गप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. महादरवाजाच्या लाकडी प्रवेशद्वाराचे लोकार्पण हुतात्मा दीपक घाडगे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.
गजलक्ष्मी मंदिर
गडावर काही शिल्प खूप आकर्षक अन लक्षवेधी असतात. किल्ले सुधागडावर सुद्धा असेच एक गजलक्ष्मी शिल्प आहे. वाड्याकडून जाताना भोराई मंदिराच्या अगोदर डाव्या बाजूला हे गजलक्ष्मी शिल्प आहे. गतकाळात या शिल्पावर छोटेखानी मंदिर स्वरूपात बांधकाम होते.
मध्यवर्ती कमळावर विराजमान झालेली चतुर्भुज माता लक्ष्मी आणि तिच्या उजवीकडे अन डावीकडे उदककलश सोंडेमध्ये घेऊन (मातेवर जलाभिषेक करण्यासाठी) उभे असलेले हत्ती असे या शिल्पाचे स्वरूप असते. देवी लक्ष्मीच्या दोन हातांत कमळ, उजवीकडील हात अभयमुद्रेत तर डाव्या हातातील कलशातून पडणारे सुवर्ण दाखविले जाते.
अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रमोदिनीम्।
श्रियं देवीमुप ह्वये, श्रीर्मा देवी जुषताम्।।
या श्लोकातील हत्ती हे पावसाच्या ढगांचे रूपक आहे. पुराणात पृथ्वीला लक्ष्मी माता संबोधले आहे. हत्ती हे पर्जन्याचे संबोधक आहेत तर कमळ हे अत्यंत पवित्रपुष्प समजले जाते. ग्रीष्म ऋतूत पूर्ण पृथ्वी उन्हाच्या ज्वाळांनी तप्त झालेली असते आणि तिलाच हरित करण्यासाठी आणि धरणीवरील जीवनात नवचैतन्य येण्यासाठी पर्जन्यवर्षाव होत असतो. त्याचीच आखणी या शिल्पात केलेली आहे. अशी ही गजलक्ष्मी समृद्धी अन ऐश्वर्याचे प्रतीक मानली जाते. सृजन ही खूप मोठी शक्ती स्त्रीकडे असते. जन्म या घटनेशिवाय सर्जनशील कल्पना सुचणे, नवनिर्मिती होणे, वृक्ष-लता रुजणे, त्यांना फळे-फुले येणे, धान्य उगविणे अशा अनेकविध गोष्टींत सृजनाचा आविष्कार होत असतो. माणसाच्या मनात उमलणाऱ्या भावना, त्याला सुचणाऱ्या कल्पना, त्यातून त्याच्या हातून घडणाऱ्या सर्जनशील गोष्टी यांमुळे तो वेगळा ठरत जातो. या साऱ्याला 'गजलक्ष्मी' पावित्र्याचे अधिष्ठान देते. यास सृजनशीलतेचे प्रतीक सुद्धा मानले जाते.
मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि।
पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यशः।।
हे देवी, तुझ्या प्रभावामुळे माझ्या इच्छा पूर्ण होवोत. माझे संकल्प सिद्धीला जावोत. माझ्या वाणीला सत्यता प्राप्त होवो. पशूधन, अन्नाची वृद्धी होवो. माझ्या घरी 'श्री'चा वास होवो. मी यशवान, कीर्तिवान होवो.
अशा हा पृथ्वीदेवतेला बऱ्याच ठिकाणी साधे छप्पर सुद्धा नसते. किल्ले सुधागडवर असलेल्या गजलक्ष्मी शिल्पावर पूर्वीच्या काळात छप्पर होते तसे बांधकाम अन खांबांचे अवशेष दृष्टीस पडत होते. या अशा शिल्पांचे जतन, संवर्धन करणे ही आपली शिवप्रेमींची जबाबदारी आहे. याने पुढील काळात होणारी शिल्पांची झीज थांबू शकते, त्यांचे आयुर्मान वाढेल या उद्देशाने बा रायगड परिवाराच्या माध्यमातून या गजलक्ष्मी शिल्पास एक छोटेखानी मंदिर अर्पण केले आहे. लोकसहभागातून उभारलेल्या या मंदिराचे शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२० रोजी लोकार्पण केले...
या अशा अनेक कार्यात आपणा सर्वांचे पाठबळ नेहमीच राहिले आहे अन यापुढेही राहील असा विश्वास आहे...
धन्यवाद...
रायरीचा उपदुर्ग म्हणून महाराजांनी लिंगाणा उभारला. लिंगाण्याचे अस्तित्व शिवपूर्वकाळापासून आहे. महाराजांनी त्याची डागडुजी करून त्यास गड बनवला अन त्याचे कारागृह म्हणून वापर केला.
लिंगाणा म्हणजे एक अभेद्य सुळका एवढीच ओळख असलेला अन अनास्थेने किल्ला म्हणून विस्मरणात गेलेला एक दुर्ग. आरोहनाच्या सुळक्यासोबतच लिंगाण्याच्या पोटात एक किल्ला आहे. त्याचा महाराजांनी कारागृह म्हणून वापर केला. घाटावरून उतरणाऱ्या बऱ्याच नाळवाटांवर, त्यामार्गे होणाऱ्या व्यापारावर, रायगडाकडे येणाऱ्या शत्रूवर लिंगाणा नजर रोखून आहे.
लिंगाण्याचा मुख्य मार्ग हा कोकणातून पाने गावातून आहे. आधी लिंगाणा माची मग किल्ला असा मार्ग आहे. पण प्रस्तरारोहणाच्या वाढत्या व्यावसायिकतेमुळे मोहरी,पुणे गावातून बोराट्याची नाळ उतरून आरोहण केले जाते. जुना आरोहणाचा मार्ग हा सुद्धा पाने गावातूनच होता.
लिंगाणा किल्ल्यावर चहूबाजूला पाण्याची टाकं अन किल्ल्यात बरेच दुर्गवैभव आहे. गडावर जाण्यासाठी पूर्वी लिंगाणा माचीहून वर पायवाटेने अन काही ठिकाणी पायऱ्या होत्या. मार्ग आताही दिसतो. गतकाळात झालेलं भुसख्खलन अन नंतर इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेले किल्ल्यांचे मार्ग यामुळे वाट आता नाहीशी झाली आहे. माचीवर मधल्या टप्यात आल्यावर तिथे पाण्याचे टाके, गुहा, शिवपिंड आदि अवशेष आहेत. येथूनच वर गडावर जाण्यासाठी असलेला बांधीव पायरीमार्ग आहे. पण उध्वस्त केला आहे त्याच्या काही पायऱ्या आजही मार्गाचे अस्तित्व दाखवतात. पण त्यामुळे आता गडावर सहज पोचता येत नाही कारण मार्ग उरला नाही. त्यामुळे आता गडावर जायचं असल्यास प्रस्तरारोहणाचे साहित्य अन तंत्र अवगत असले पाहिजे. लिंगाणा किल्ल्यावर जाणे तेव्हाही अवघडच होते. शिड्या अन दोर कापले तर किल्ल्यावर पळून जाणे अशक्य त्यामुळे कैदी पळून जाण्यासही धजावत नव्हते.
परिवारातर्फे लिंगाण्यावर बऱ्याच आरोहण मोहिमा झाल्या अन याच लिंगाण्याने परिवाराला भरपूर निष्ठावंत हात सुद्धा दिले. त्याच लिंगाण्याची उतराई म्हणून गडावर जाण्याचा मार्ग सुकर करायचा परिवाराने ठरवलं.
गडावर जाण्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी रोप लावण्याचे नियोजन ठरले. ६ व ७ एप्रिल २०१९ रोजी दोन दिवसीय मोहिम आखली गेली. किल्ल्यावर असेच जाणे अवघड आहे अन त्यात लोखंडी रोप व इतर साहित्य चढवणे म्हणजे दिव्यच. पण परिवाराच्या धुलिकानांनी हे धनुष्य लिलया पेलेलं. एक टीम साहित्य लोखंडी रोप व इतर साहित्य घेऊन पाने लिंगाणा माची करत व दुसरी टीम जेवण साहित्य घेऊन मोहरीतून लिंगाण्याच्या पायथ्याला आली.
सध्याच्या प्रचलित आरोहण मार्गावरून दोन वर्षांपूर्वी दिवंगत अरुण सावंत सरांच्या टीम ने ट्रॅव्हर्स मोकळा करून किल्ल्याकडे जाणारी वाट तयार केली होती. ही वाट अत्यंत धोकादायक आहे. थोडीशी चूक जिवावर बेतू शकते. या धोकादायक वळणावर लोखंडी रोप लावून मार्ग सुरक्षित केला गेला. गडावर जाण्यासाठीचा पायरीमार्ग उध्वस्त झाला आहे त्या ठिकाणी लोखंडी रोप लावून मार्ग चढाई करण्यासाठी सुकर केला आहे.
अरुण सरांनी किल्ल्यातून सुळक्यावर चढाई केलेली त्यामुळे बोलटिंग साठी अँकर मारून ठेवलेले आहेत. याचा अँकर फासनर, हँगर प्लेट अन डी क्लॅम्प च्या साहाय्याने रोप फिक्सिंग केले गेले. या लोखंडी रोपवर स्वतः आम्ही लटकून चाचणी केली आहे. ते सुरक्षित आहेत याची खात्री केली आहे.
आता गडावर जाण्यासाठी अडचण नसली तरी मार्ग धोकादायकच आहे. त्यामुळे गडावर जाताना माहितगार घेऊनच जावे. आरोहण साहित्य असल्यास उत्तमच. पण वाटाड्या पाहिजेच.
या मोहिमेत सहभागी सदस्यांनी केलेली बेजोड मेहनत अन प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर हे कार्य तडीस गेले आहे. मोहिमेतील सर्व सहभागी सदस्यांचे विशेष कौतुक अन अभिमान आहे.
ऊन, वारा, पाऊस यामुळे लोखंडी रोपची झीज ही होणारच त्यामुळे जाताना व्यवस्थित जावे. सहज जाता येतंय म्हणून बेफिकीर राहू नये. आम्ही रोप लावला असला तरी लिंगाण्याची दुर्गमता अन अभेद्यता राखली आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच किल्ल्यास भेट द्यावी ही नम्र विनंती.
बा रायगड परिवाराची पहिली अभ्यास मोहीम १३ ते १७ ऑक्टोबर २०१६ दरम्यान किल्ले रायगडावर पार पडली. या पहिल्या वहिल्या मोहिमेस मार्गदर्शन राहिले ते या गडदुर्गांच्या निस्पृह वारकरी दस्तुरखुद्द श्री.आप्पासाहेब परब यांचे.
आपले संबंध आयुष्य गडकिल्ल्यांच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेल्या आप्पांकडून काही जबाबदारी मिळणे म्हणजे परमभाग्य..
रोह्याच्या खाडीवर अन या भागातून होणाऱ्या व्यापारावर नजर रोखून असलेला महत्वाचा अन लढाऊ किल्ला म्हणजे 'अवचितगड'.
पूर्वी अवचितगडावर एक तोफ होती जी आप्पानी पहिली होती पण आता ती तिकडे नव्हती. राहाळपरिसरातच कुठंतरी ती हरवली असण्याची , गाडली गेली असण्याची दाट शक्यता होती.
आप्पांनी परिवाराच्या धुळीकणांना त्याच तोफेचा शोध घेण्याचे आवाहन केले. आप्पांनी केलेले आवाहन परिवाराच्या मनोज थिटे अन सौरभ घरट या जोडगोळीने स्वीकारले अन विडा उचलला या शोधमोहिमेचा..
पुरातत्व खात्यात कार्यरत असणारे श्याम पवार यांच्या कडून एक तोफ २००० साला पासून नाहीशी झाली आहे असे खात्रीलायक समजले. म्हणजे दैदिप्यमान इतिहासाचा वारसा तब्बल सोळा वर्षे काळाच्या आड होता.
जसा वेळ मिळेल तसे परिवाराचे सदस्य अविचगडाच्या रहाळात शोध घेत होते. तीव्र उतार, जंगल, झाडेझुडपे पालथी घालत शोधकार्य चालू होते. एक नाही दोन नाही तब्बल १० मोहिमांमध्ये हाती यश लागले नाही. पण कोणीही हरणार नव्हते अन घेतला वसा टाकणार नव्हते.
१५ डिसेंबर २०१६ रोजी अकराव्या मोहिमेचा एल्गार सौरभ घरट यांनी केला. अथक प्रयत्नांनी पोरांच्या कष्टाला यश आले अन एका उतारावर मातीने पूर्णपणे गाडलेल्या अवस्थेत तोफ दृष्टीस पडली. अन एकच जल्लोष झाला. मेहनत फळाला आली.
विशेष म्हणजे या तोफेत अजूनही एक गोळा अडकून आहे.
या मुलूखमैदान तोफेचा दराराच जणू त्यातून प्रतीत होतोय.
तब्बल सोळा वर्ष ही तोफ स्वतःचे अस्तित्व टिकवत या निसर्गाशी झगडत होती. अवचितगड रहळातील स्थानिक मुलं , शिवशंभू प्रतिष्ठाण अन बा रायगडच्या सदस्यांनी दोन दिवसीय मोहिमेत ही तोफ गडावर सुखरूपपणे पोचवली.
लढाऊ बाण्याचे प्रतीक असलेल्या या ऐतिहासिक ठेव्यास गतवैभव प्राप्त करून दिल्याचे सुख प्राप्त झाले.
ही तोफ शोधण्यात परिवाराचे निष्ठावंत धूलिकण मनोज थिटे, सौरभ घरट, रोहित घरट, विकी शेलार, विशाल निकम यांचा सिंहाचा वाटा आहे.
बा रायगड परिवाराच्या रायगड विभागाचे हे यश आहे.
ही तोफ परिवारासाठी खूप प्रेरणादायी आहे.
सुमारगड शिडी
जावळीच्या खोऱ्यातील किर्रर्र जंगलात एकाच रांगेत असणारे हे दुर्ग जावळीच्या अभेदयतेची निशाणी आहेत. महिपतगड - सुमारगड - रसाळगड हे एका रांगेतील तीन गडांची शृंखला.
खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.
सुमारगड हा नावाप्रमाणेच "सुमार" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.
महिपतगड व रसाळगडाच्या पायथ्याशी गाडी जातेय म्हणून आता चढाई सुकर झाली आहे. पण सुमारगड अजूनही स्वतःची दुर्गमता राखून आहे. पायथ्यापासून सुमारगड चढणे म्हणजे दमछाक करणारी चढाई. त्यात शेवटच्या टप्प्यात ताशीव कडा असल्याने मार्ग नाही. त्यामुळे पूर्वी एक शिडी लावून मार्ग काहीसा सुकर केला पण कालांतराने तीही मोडकळीस आली अन धोकादायक झाली.
सुमारगड जरी भटकंती साठी उत्तम किल्ला असला तरी स्थानिकांसाठी ते तीर्थक्षेत्र आहे. गडावर शंभूमहादेवाचे पुरातन ठाणे आहे अन दरवर्षी वाडी मालदे गावातील ग्रामस्थांचा महाशिवरात्री ला मोठा उत्सव साजरा होतो. स्थानिक गावकऱ्यांच्या साथीने परिवाराने गड संवर्धनाला घेतल्यावर गडाला नवीन शिडी अर्पण करण्याचे ठरवले. ग्रामस्थांना , पर्यटकांना अन दुर्गपप्रेमींचा प्रवास यामुळे सुकर होणार होता. परिवाराने ग्रामस्थांच्या साथीने हा विडा उचलला. ग्रामस्थ साथीला आहेत म्हणून परिवार गडावर उत्तमरीत्या काम करू शकतोय.
शिडी निर्माणाचे काम वाडी मालदे गावातील भार्गव चव्हाण अन आण्णाजी चव्हाण यांना दिले. त्यांचा फॅब्रिकेशन चा व्यवसाय असल्याने त्यांनी हे काम चोख पार पाडले. शिडीची जागा , मोजमाप ई सर्व जबाबदाऱ्या गावकऱ्यांनी इमाने इतबारे पार पाडली. परिवाराला शिडीसाठी लागणारी आर्थिक बाजू सांभाळायची होती. नियोजित वेळेत शिडीचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले. अखंड शिडी वर शक्य नव्हते म्हणून सुट्या भागात बनवून गडावर नेऊन नट बोल्ट च्या साहाय्याने बसवायचे नियोजन ठरले.
सुमारगडची जीव काढणारी चढाई अन त्यात शिडीचे सुटे वजनी भाग वर नेणे म्हणजे जिकरीचे काम. पण ग्रामस्थ व परिवाराच्या सदस्यांनी दोन दिवसात सर्व साहित्य गडावर नेले. ३ मार्च २०१९ रोजी गडावर शिडी बसविण्याचे अंतिम काम करण्याचे ठरले त्याप्रमाणे ग्रामस्थ, परिवाराचे स्थानिक धूलिकण अन मुंबईचे काही सदस्य ठरलेल्या वेळेला गडावर पोचले. मार्च म्हणजे उन्हाचा जबरदस्त तडाखा अन त्यात खडी चढाई याने सर्वांचे जीव मेटाकुटीला आलेले पण हार मारतील ते मावळे कसले या उक्तीप्रमाणे ध्येयवेड्या सदस्यांनी ही जबाबदारी लीलया पेलली. देवळाच्या खिंडीच्या वरच्या बाजूला जिकडे जुनी शिडी होती तिकडेच ही शिडी लावण्यात आली.
फॅब्रिकेटर स्वतः सोबत असल्याने गडावर व्यवस्थित शिडी लावली गेली. अन घेतलेला ध्यास पूर्ण झाला.
या शिडीने गावकऱ्यांची , दुर्गप्रेमींची गडावर येणारी संख्या वाढणार आहे पर्यायाने गड राबता राहणार आहे. अन सुमारगडचा सुमारपणा जाण्यास मदत होणार आहे.
या सर्व कार्यात मोलाचा वाटा होता वाडी मालदे गावातील ग्रामस्थ. स्थानिकांकडून गडसंवर्धनासाठी एवढी साथ मिळणे हेच खूप प्रेरणादायी आहे. तसेच परिवरच्या रत्नागिरी विभागाचे विशेष कौतुक ज्यांनी हे कार्य तडीस नेले.
या अन अशी अनेक कार्य परिवाराच्या माध्यमातून होत राहतील आपण ही कार्यात सहभागी होऊन महाराजांच्या इतिहासातील भूगोल टिकवण्यासाठी निमित्त व्हा.
धन्यवाद.
२०१९ च्या पावसाने महाराष्ट्र भर थैमान घातले आणि त्यात सांगली अन कोल्हापूरला आजवरच्या सर्वांत मोठ्या पुराने उध्वस्त केले. सांगली कोल्हापूरच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एकवटला. परिवाराने सुद्धा या पुरग्रस्तांसाठी स्वतःला झोकून दिले.
बा रायगड परिवार सेवा मोहीम अंतर्गत पुराच्या पार्श्वभुमीवर परिवाराने मदतीचे अवाहन केले. त्यातून मदतीचा ओघ आला. ती मदत आम्ही सगळीकडे वाटप केली..फुल न फुलाची पाकळी म्हणून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या अनेकांनी आपले कर्तव्य बजावले...बा रायगड परिवाराचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला असल्याने सांगली ,कोल्हापूर भागात आपलेच काही सदस्य परिवाराचे काम इमाने-इतबारे पाहत आहेत,त्यामुळेच मदत ही योग्य जागी कशी पोहचली जाईल याची दक्षता परिवाराने घेतली...
महत्वेकरून पूर ओसरल्यावर ज्या ठिकाणी खरंच आवश्यकता होती अश्या ठिकाणांचा,गावांचा शोध घेऊन तिथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला त्यात..जुने चावरे, जुने पारगाव, निलेवाडी, परबतवाडी, अंकलखोप, बहे बोरगाव, सुर्यगाव, आष्टा, शिरगाव, सांगली,राजापुरवाडी, धरणवाडी, लक्ष्मीमळा धानवड, या ठिकाणी गृहपयोगी वस्तूंचे किट तैयार करून पोहचवण्यात आले शिवाय गावाच्या वेशीपासून ते गल्ली बोळ्यापर्यंत ब्लिचिंग पावडर व फिनेल टाकण्याचे काम करण्यात आले..शिरगाव येथील हवालदारनगर येथे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते ,मुंबईचे डॉ.तेजस लोखंडे , सौ.चैत्राली कारेकर व अश्विन निगवेकर यांनी ही कामगिरी बजावली...सांगली विभागात श्री अरुणदादा पाटील,योगेश सुतार,महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेवा पुरवण्यात आल्या..वाठार येथे मोफत हॉलची व एक वेळेच्या जेवणाची सोय श्री. राहुल पोवार यांनी केली...विजय धुमाळ यांनी एका घरासाठी दरवाजा व खिडकी देण्याचे काम पूर्णत्वास नेले...शिवअस्मिता सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्यात मोलाचा हातभार उचलला(येत्या काही दिवसात ते पोहचवले जाईल.)
श्री.अरुणदादा पाटील, श्री.भाई बिचकर, श्री.योगेश सुतार यांच्या नेतृत्वामध्ये बा रायगड परिवाराच्या सर्वच धुरंधरांनी (विशेषतः बा रायगड परिवार कोल्हापूर विभाग व बा रायगड परिवार सांगली विभाग) प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवला...मातीने माती साठी निर्माण केलेली नाती जुळून आणत प्रत्येक जण या मदत कार्यासाठी झटत होता,आभार प्रदर्शन करण्याचा खरंच हा काळ नाही पण तुम्हा सर्वांचे बा रायगड परिवारातर्फे खूप खूप कौतुक... अशीच साथ व सोबत राहून सुराज्य निर्माण करत माणुसकी जपुयात...
धन्यवाद!
ताकदीची गरज तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचे असते, नाहीतर दुनियेत सर्वकाही मिळवण्यासाठी प्रेम पुरेसे आहे.
बा रायगड परिवार अन मौदा ग्रामीण नागपूर येथील तरुणांच्या साहाय्याने भामरागड गडचिरोलीच्या पुरग्रस्तांसाठी असेच प्रेम वाटून आले.
आपली स्वतःची सर्व ताकद लावत गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रेम भावना जोपासण्यात यश मिळवलं आहे.
दुर्गम अति दुर्गम भाग असल्याने जनसामान्यांपर्यन्त न पोचनारा आदिवासी बांधवांचा टाहो परिवाराच्या मौदा, नागपूर टीम ने ऐकला अन सज्ज झाले कर्तव्यपूर्ती साठी.
१४ सप्टेंबर २०१९ रोजी टीम गृहउपयोगी साहित्याचा पूर्ण संच असलेले १५० किट घेऊन शिवरायांचा आशिर्वाद घेऊन भामरागड कडे रवाना झाले. येथे पोचून स्थानिकांच्या मदतीने कृष्णार या गावी जाऊन प्रथम मदत कार्य केले. पुराने बराच भाग प्रभावित असल्याने अन घनदाट जंगलांमुळे परिस्थिती बिकट झाली होती. पण मागे हटतील ते शिवरायांचे मावळे कसले.
जिकडे पोचता येत नाही अशा ठिकाणी ट्रॅकटर च्या साहाय्याने रात्रीच्या अंधारवाटेपर्यंत गरजूंच्या घरापर्यंत पोहचवले..
त्या आदिवासी बांधवांचा रोजचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप काही शिवकवून जातो. मदत केल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पराकोटीचे समाधान प्राप्त करून गेला.
पूरग्रस्त भागात मदतकार्य केल्यानंतर टीम वंचितांच्या अंधारमय आयुष्यात प्रकाशवाट दाखवणाऱ्या महर्षी श्री. प्रकाश आमटे यांनी नंदनवन केलेल्या हेमलकसा गावात मुक्कामासाठी आली. येथील लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे मानवतेचा मूर्तिमंत उदाहरण. प्रकाशदादांची संस्था पुरग्रस्तांना उभं करण्याचं कार्य नेटाने करत आहे. येथे राहिलेल्या ८० साहित्यसंच प्रकाशदादांच्या हातात सुपूर्द केले.
परिवाराचे अन मावळ्यांचे श्री. प्रकाश बाबा आमटे यांनी तोंडभरून कौतुक केले अन पुढील कार्यासाठी शुभेच्छास्वरूप पाठबळ दिले.
या कार्यात परिवाराच्या मौदा, नागपूर येथील श्रीधर वडे, श्याम नारनवरे, अतुल कडू, संजय वडे, प्रफुल बर्गतकर, इंद्रापाल बावणे, रोशन बावणे, नितीन डोंगरे, सत्यम गिरडकर तसेच स्थानिक सहाय्यक चिनुदादा महाक व लालसूदादा नागोटी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.
तुम्हा सर्वांचा अभिमानच नाहीतर गर्व आहे परिवाराला. असेच उत्तोरोत्तर कार्य वाढत राहो..
तसेच मदतकार्यात ज्ञात-अज्ञात हातांचे मनस्वी आभार. श्री. प्रकाश आमटे यांचे अन त्यांच्या संस्थेचे आभार केवळ शब्दात व्यक्त करू शकत नाही.
दुर्गम भागात परिवाराच्या कार्यपद्धतीला अनुसरून कार्य पोचत आहेत , आमचे शिलेदार कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे..